मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर बोचरी टीका केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रसार माध्यमांनी या टीकेला अनुसरून प्रश्न विचारला असता, उद्धव ठाकरेंच्या त्या टीकेला आम्ही योग्य वेळ आल्यावर योग्य पद्धतीने प्रतिउत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रश्नाला अनुसरून फडणवीस यांनी मोजक्या शब्दात ही संक्षिप्त प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठांनी सुद्धा राज्यातील प्रतिनिधींना या विषयावर शांत राहण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे.
मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबतच्या युतीबाबत प्रतिकूल मत नोंदवलेले आहे. परंतु, पंढरपूर येथील सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत थेट भूमिका न मांडता भाजपावर टीका केली होती आणि संभ्रम कायम ठेवला आहे. दरम्यान, शिवसेनेचे इतर नेते सुद्धा युतीबाबत एकही अनुकूल मत व्यक्त करताना दिसत नसल्याने सस्पेन्स वाढत आहे.
