नाशिक : नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नगरसेवकांना दिले आहेत. त्यामुळे नाशिककरांच्या तीव्र संतापापुढे भाजप नरमली असल्याची चर्चा नाशिक शहरात रंगली आहे.
आगामी निवडणुकीत सुद्धा भाजपला याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात अशी शक्यता निर्माण झाल्याने भाजपने नाशिककरांच्या रोषापुढे शरणागती पत्करल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषक बोलत आहेत. नाशिक महापालिकेतील ज्या करवाढीचा मुद्दा पुढे रेटत तुकाराम मुंढेंच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला होता, त्यात आयुक्तांनी सुद्धा काही अंशी माघार घेतल्याचे बोलले जात आहे.
परंतु जनतेचा रोष पाहता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन स्थानिक भाजप नगरसेवकांना चांगलाच धक्का दिल्याने, आज येणारा अविश्वास प्रस्ताव भाजपला मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे बासनात गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनातील हा संघर्ष क्षमण्याची शक्यता आहे.
