मुंबई : देशातील मोदी सरकारला सत्तेत येऊन ४ वर्ष पूर्ण होत असताना मोदीसरकार म्हणजे लोकांना केवळ आश्वासनांची खैरात करत ‘मेरा भाषण ही मेरा शासन’ असा थेट संदेश नरेंद्र मोदींनी देशाला दिला आहे. मोदीसरकारची ४ वर्ष म्हणजे केवळ जुमलेबाजी करतच स्वतःचे कौतुक करण्यावर भर असल्याची टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली. त्यांनी आज मुंबई कॉंग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवर सर्वच विरोधी पक्षांची भाजपविरोधी आघाडी तयार होत असली तरी, त्यात शिवसेना सहभागी नसल्याचे कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि जेष्ठ नेते अभिषेक मनु संघवी यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबई काँग्रेसने नरेंद्र मोदीसरकारच्या ४ वर्षाच्या कार्यकाळातील घोषणा आणि त्याची अंमलबजावणी संबंधित ‘जुमला किंग’ या शीर्षकाने सोशल मीडिया सिरीजची सुरुवात सिंघवी यांच्या हस्ते मुंबईतील काँग्रेस कार्यालयात करण्यात आली तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.
जेंव्हा प्रश्नोत्तराच्या वेळेत पत्रकारांनी विरोधकांच्या देशपातळीवरील एकीसंदर्भात विचारले तेंव्हा भाजप विरोधातील या आघाडीत शिवसेनाचा सहभाग असेल काय, त्यावर सिंघवींनी पक्षाचा वैचारिक मतभेदाचा मुद्दा उपस्थित करून त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली.
