मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी भाजप – सेना युतीवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या मते आजचे युतीचे उद्योग म्हणजे मी लहानपणी पाहिलेलं सर्कसच. “कधीकाळी बाळासाहेब भाजपचा उल्लेख कमळाबाई म्हणून करायचे आणि भाजप शिवसेनेचा उल्लेख थोरला भाऊ म्हणून करत. इतकेच नाही तर राजकारणाच्या मैदानात जंगलातल्या ढाण्या वाघप्रमाणे ते लढायचे, सर्वांना त्यांच्याबद्दल आदर होता”, अशा शब्दात रोहित पवारांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली.
सध्या बदलत्या परिस्थिती नुसार उद्धव ठाकरेंनी मोदींना मोठा भाऊ मानलं आहे आणि काळाची चक्र उलटी फिरवण्याची कामगिरी त्यांनी करून दाखवली, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. पाच वर्ष उद्धव ठाकरेंनी फक्त मगरीचे अश्रू ढाळले आणि मुद्दे सोडून वैयक्तिक टीका केली. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकी दरम्यान एकमेकांचे वाभाडे काढणारे सेना भाजप आज मांडीला मांडी लावून एकत्र प्रचार करत आहेत. तसेच उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे काळीज, कोथळा, वाघनखे, अफझल खान वगैरे वगैरे पण विकासाचे मुद्दे नक्कीच नाहीत.
युतीचे हे आजचे उद्योग पाहिले की लहानपणी पाहिलेली सर्कस आठवते. पण त्या सर्कशीत दहा वीस रुपये देऊन किमान लोकांना आनंद तर मिळायचा. इथे तर सर्कस करुन लोकांच्या भावनेबरोबरच निवडणुकीतल्या मुख्य मुद्यांसोबत देखील खेळण्याचा प्रयत्न होत आहे. बाळासाहेबांमुळे सुवर्ण अक्षरात लिहलेला शिवसेनेचा इतिहास आता मात्र महाराष्ट्राला सर्कस देणारा पक्ष म्हणून केला जाईल, अशी टीका रोहित पवारांनी केली.
