मुंबई : सारी जनावरे एकत्र येऊन कळप केला, तरी ते वाघाला पराभूत करू शकत नाहीत, मोदी वाघ आहेत, शेर तो जंगलका शेर है, बाकी अपने अपने गली मे कुत्ते-बिल्ली होते है, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी देशभरातील विरोधी पक्षांवर विखारी टीका केली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या दांडय़ा उडविल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.
प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर आयोजित केलल्या युवा महासंगम जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर चोर, कोल्हे, जनावरे, पाकधार्जिणे, अशा शेलक्या शब्दांत टीकेची जोड उठविली. दरम्यान, या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार अशीष शेलार, भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन, प्रदेश भाजयुमो अध्यक्ष योगेश टिळेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री चषक ही सुरुवात आहे, परंतु आता हेच मावळे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर मोगली सत्तेचा निपात केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला. २०१४ चा भारत देश कसा होता, पंतप्रधान मुके होते, त्यांच्या बोलण्यावर बंदी होती, मॅडम सांगतील तसे ते वागत होते, अशी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. ते म्हणाले की, २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वाभिमानी बनविले. देशाच्या सुरक्षेची चिंता करायची नाही, देश बलशाली होत आहे.
दरम्यान, पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, सारे चोर एकत्र आले, जनावरांनी एकत्र येऊन कळप केला तरी, वाघाला पराभूत करू शकत नाहीत आणि मोदी वाघ आहेत, असा विरोधकांवर हल्लाबोल त्यांनी केला. या देशात फक्त नरेंद्र मोदी हे एकमेव राष्ट्रीय नेते आहेत. शरद पवार, ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव, चंद्राबाबू नायडू, स्टॅलिन, हे आपापल्या प्रदेशाचे नेते आहेत.
