औरंगाबाद : शिवसेनेतील जुनी खदखद चव्हाट्यावर आली आहे. औरंगाबाद येथे औरंगाबाद शाखेच्या वर्धापन कार्यक्रमात आणि व्यासपीठावर औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार आणि महिला अध्यक्ष मनीषा कायंदे उपस्थित असताना केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी ही जुनी आठवण करून दिली.
माझं राजकीय आयुष्य संपविण्याचा विडा रामदास कदमांनी उचलला होता. परंतु त्यांच्या मुलाला जेव्हा आमदार करायची वेळ आली होती, तेव्हा मात्र त्यांनी माझी दिलगिरी व्यक्त केली होती असं अनंत गीते म्हणाले. त्यामुळे कोकणातील या दोन नेत्यांचे जुने वैर समोर आलं आहे.
आधीच औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे आणि रामदास कदम यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे आणि त्याचे पडसाद थेट मातोश्रीवर जाऊन रामदास कदमांकडून औरंगाबादच पालकमंत्रिपद काढून घेण्यात आलं होत. परंतु रामदास कदमांचे शिवसेनेतील दोन राजकीय वैरी एकाच मंचावर आले आणि अनंत गीते यांच्यातील ही खदखद बाहेर आली आहे. त्यामुळे रामदास कदमांच्या विरोधातील लॉबी एकत्र येत आहे का अशी शिवसेनेत चर्चा रंगली आहे.
तसेच पुढे भावनिक भाषण करताना अनंत गीते म्हणाले की, माझ्यावर आली तशी वेळ कुणा शिवसैनिकावर येऊ नये,” असं काम करण्याचं आवाहन अनंत गीतेंनी उपस्थितांना केलं. तसेच मागील लोकसभा निवडणुकीत मी फार कमी मताने निवडून आलो. एवढच नाही तर विरोधकां बरोबरच स्वकियांसोबत म्हणजेच रामदास कदम यांच्यासोबतही लढावं लागलं तरी माझा विजय झाला असं अनंत गीते थेट रामदास कदम यांचं नाव घेऊन म्हणाले. त्यामुळे येथे निवडणुकीत ही शिवसेनेतील अंतर्गत खदखद बाहेर आली तर आश्चर्य वाटायला नको.
