श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या यूपीतील २ सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांने एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानात किती दहशदवादी ठार झाले त्याचे पुरावे मागितले आहेत. भाजपचे नेते आणि प्रसार माध्यमं निरनिराळे आकडे सांगत असले तरी भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेल आहेत यावरुन विरोधक, आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमं तर प्रश्नचिन्ह उपस्थित करतच आहेत. परंतु आता शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी देखील किती दहशदवादी मारले गेले त्याचे पुरावे मागितले आहेत.
१४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदने जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर भ्याड दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे तब्बल ४४ जवान शहीद झाले होते. यामध्ये प्रदीप कुमार आणि राम वकील यांचा देखील समावेश होता. यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारीला भारताने एअर स्ट्राइक केला होता. यावेळी भाजपचे नेते तब्बल ३५० दहशतवादी ठार झाल्याचं स्वतःच्या भाषणबाजीत सांगून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. परंतु, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी मृतांच्या आकड्यावर मोठी प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहेत. मंत्र्यांनी वेगवेगळी आकडेवारी दिली असली तरी वायूदलाने मृतदेह मोजणं आपलं काम नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
‘ज्याप्रमाणे पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आम्हाला मृतदेह पहायला मिळाले, त्याचप्रमाणे आम्हाला त्यांचेही मृतदेह पहायचे आहेत. एअर स्ट्राइक झाला आहे यामध्ये काही दुमत नाही, परंतु त्यामुळे किती नुकसान झालं आणि किती दहशदवादी ठार झाले? त्याचे स्पष्ट पुरावे मिळाले पाहिजेत. जर पुरावाच नसेल तर आम्ही विश्वास कसा ठेवायचा ? पाकिस्तान काहीच नुकसान झालं नसल्याचा दावा करत असताना आपल्याकडे पुरावाच नसेल तर विश्वास कसा ठेवणार’, अशी विचारणा शहीद जवाना राम वकील यांची बहिण राम रक्षा यांनी विचारला आहे. पुरावा पाहिल्याशिवाय आम्हाला शांती मिळणार नाही आणि माझ्या भावाच्या मृत्यूचा बदला घेतला आहे याची खात्रीही पटणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.
शहीद जवान प्रदीप कुमार यांच्या आईनेही पुराव्यांची मागणी केली आहे. ‘आम्ही संतृष्ट नाही आहोत. किती मुलांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या बाजूला एकही मृतदेह दिसलेला नाही. खरंतर कोणतीही खात्रीलायक बातमी नाही आहे. आम्ही हे टीव्हीवर पाहणं गरजेचं आहे. आम्हाला दहशतवाद्यांचे मृतदेह पहायचे आहेत’, अशी मागणी 80 वर्षीय सुलेलता यांनी केली आहे.
