नवी दिल्ली : नवी दिल्लीत आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांना आणि विरोधकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. समाजवादी पार्टीने मोदी सरकारला मागासवर्गीय आणि दलितांच्या आरक्षण प्रश्नावरुन धारेवर धरण्याचे ठरवले आहे.
परंतु नंतर विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार, महागाई यांसारख्या मुद्द्यांवरुन अधिवेशनात रान उठवले आहे. मॉब लिंचिंगप्रकरणी अधिवेशनाच्या पहिल्यादिवशीच स्थगन प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संसदेचे कामकाज सुयोग्य रितीने चालणे हे देशहिताचे असल्याने केंद्र सरकार सर्व राष्ट्रीय मुद्द्यावर संसदेत खुली चर्चा करण्यास तयार असल्याचे संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यसभेचे सभापती एम. वैंकय्या नायडू यांनी सुद्धा राज्यसभेतील प्रमुख नेत्यांची भेट घेत पावसाळी अधिवेशना दरम्यान केंद्र सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे विरोधक नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
