मुंबई : २०१४ मधील निवडणुकीपेक्षा यंदा भारतीय जनता पक्षाने शंभर जागा कमी जिंकल्यास, आगामी पंतप्रधान भारतीय जनता पक्ष नव्हे तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए ठरवणार, असे सूचक विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. विशेष म्हणजे हेच बोलण्याची संधी त्यांना अमित शहा एकाच पत्रकार परिषदेत उपस्थित असताना सुचले नाही हे विशेष.

संजय राऊत यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली असून सदर मुलाखतीत त्यांनी युती विषयी सविस्तर भाष्य केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पंतप्रधानपद यासंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, मी पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांना पाठिंबा दिलेला नाही. प्रसारमाध्यमं आणि संघाकडून अशा बातम्या पेरल्या जातात. आम्ही भाजपासमोर अशी कोणतीही अट ठेवलेली नाही. आणि फक्त गडकरीच का?, भाजपाकडे अनेक चेहरे आहेत. भाजपाने गेल्या वेळी पेक्षा म्हणजे २०१४ पेक्षा यंदा शंभर जागा कमी जिंकल्यास आगामी पंतप्रधान भाजपा नव्हे तर एनडीए ठरवणार, असे सुद्धा यावेळी स्पष्ट केले.

शिवसेनेने गेल्या साडेचार वर्षांत विविध मुद्द्यांवरुन भाजपवर सत्तेत राहून टीका केली होती. आता तोच पक्ष नरेंद्र मोदींसोबत निवडणुकीत उतरणार आहे, याकडे लक्ष वेधले असता संजय राऊत म्हणतात, आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्मार्ट सिटी किंवा उद्योगधंदे सुरु करु देणार नाही. म्हणून आम्ही भूसंपादन कायद्याला विरोध दर्शवला. बुलेट ट्रेन प्रकल्पात शेतकऱ्यांची जमीन जाणार असल्याने आमचा या प्रकल्पाला विरोध आहे. नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढली असे आमचे मत आहे. शिवसेना नेहमी सत्याची बाजू घेणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. आमचा विरोध सरकारी धोरणांना होता, असे त्यांनी सांगितले.

if bjp will wins hundred seats less than 2014 then nda will decide next Prime Minister says shivsena mp sanjay raut