नवी दिल्ली : भारतीय लष्कर म्हटलं की तो सामान्य भारतीयाचा एक भावनिक आणि जिव्हाळ्याचा विषय. वास्तविक भारतीय लष्कराला कोणतीही जात धर्म आणि भाषा नसते. पाकिस्तानसोबत २ महायुद्ध आणि १ चीनसोबत असा भारतीय लष्कराचा मोठा इतिहास आहे. त्यात पाकिस्तानला २ महायुद्धात धूळ चारण्याऱ्या भारतीय लष्कराच्या गाथा तितक्याच भव्य आहेत. त्यावेळचा काळ म्हणजे काँग्रेसचा आणि काँग्रेसी राजकारणाचा अशीच तत्कालीन राजकीय परिस्थिती होती. तरी लष्कर हे सार्वभौम समजून त्या भारतीय लष्कराला थेट राजकीय पक्षाशी जोडून स्वतःचा किंवा स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्याचा किळसवाणा प्रकार कधी घडला नाही, किंबहुना सध्या जसं सुरु आहे त्याप्रमाणे तर नक्कीच नाही.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आलं आणि त्यानंतर ‘मास्टरस्ट्रोक’ नावाने बातम्या झळकण्यास सुरुवात झाली. प्रत्येक गोष्ट अशी मांडली गेली की, जणू मोदी पंतप्रधान झाले आणि भारतीय लष्कराला ताकद आली. वास्तविक लष्कराच्या शौर्याचा आणि मोदींचा काहीच संबंध नाही आणि नाही काँग्रेसचा देखील. शौर्य हा भारतीय लष्कराचा जन्मजात गुण होता, आहे आणि यापुढे देखील राहील. परंतु, विषय भावनेशी जोडला गेल्याने सर्जिकल स्ट्राईकसारखे मुद्दे पुढे करून भाजप आणि मोदी सरकार स्वतःचाच प्रचार करत आहे, असंच म्हणावं लागेल.
या देशात भारतीय संरक्षण खात्याला अत्याधुनिक हत्यार, गणवेश आणि खाणं-पिणं हे मोदी पंतप्रधान झाल्यावरच मिळायला लागलं असाच जणू प्रचार सध्या समाज माध्यमांवरून मोदी आणि भाजप समर्थक करताना दिसत आहेत. काँग्रेस म्हणजे लष्कराकडे ढुंकूनही न बघणारी आणि पाकिस्तान धार्जिणी असाच एकूण प्रचार सुरु आहे. इंदिरा गांधींपासून ते थेट डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत कोणीही लष्कराकडे लक्ष दिल नाही किंवा त्यांच्या भेटीगाठी घेतल्या नाहीत, असा भाजप समर्थकांचा समाज माध्यमांवरील नित्याचा प्रचार झाला आहे. असं असलं तरी काँग्रेसने भारतीय लष्कराच्या नावाने स्वतःच्या पक्षाचं आणि नेत्याचं मार्केटिंग कधीच केलं नाही. लष्करातील जवानांच्या भेटीगाठी आणि देशाचे पंतप्रधानपदी असल्याने दिवंगत इंदिरा गांधींपासून ते डॉ. मनमोहन सिंग यांच्या पर्यंतच्या नेत्यांनी आपली जवाबदारी चोख बजावली आहे. परंतु, देशात काँग्रेसने काहीच केलं नाही असं म्हणून त्यांच्या काळात बनलेल्या सर्व सुविधा वापरण्या नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या समर्थकांना समजावणार कोण हाच कळीचा मुद्दा आहे. विषय काही असो पण भारतीय लष्कर हे राजकरण आणि राजकारण्यांचे साधन बनता कामा नये असं नक्कीच म्हणावं लागेल.
