मुंबई : इंडियन एक्सप्रेसला मिळालेल्या गोपनिय कागदपत्रांच्या आधारे हा धक्कादायक खुलासा झाला आहे. मुंबई पोलिसांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याला अटक करू नये, तसेच तो देशात आल्यावर आम्हाला गुपचूप पद्धतीने कळवावे, असे आदेश सीबीआयकडून देण्यात आले होते, असा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, विजय मल्ल्या याला अटक करण्यासाठी सीबीआयने लुकआऊट नोटीस जारी केली होती, परंतु ती नोटीस नंतर कमकुवत करण्यात आली. नोटीस कमकुवत होणं हा ‘एरर ऑफ जजमेंट’चा भाग असल्याचा दावा सीबीआयने केल्याचं वृत्त एका वृत्तसंस्थेने दिलं होतं. १६ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या त्या लुकआउट नोटीसनुसार ‘भारत सोडून जाण्यास मनाई करावी’ असा रकाना भरला होता, याचाच अर्थ असा की त्या नोटिशीनंतर विजय मल्ल्या भारत सोडू शकत नव्हता. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०१५ रोजी दुसरी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती, परंतु त्यावेळी तो रात्री उशीरा दिल्ली विमानतळावर उतरला होता. या नोटिशीत ‘भारत सोडून जाण्यास मनाई करावी या रकान्याऐवजी ‘व्यक्तीच्या येण्या किंवा जाण्यासंदर्भात माहिती द्यावी’ एवढाच रकाना भरला होता. म्हणजेच विजय मल्ल्याला अटक करु नये, केवळ माहिती द्यावी, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं. दरम्यान, त्याच्या ४ महिन्यांनंतरच विजय मल्ल्या भारत सोडून पळाला होता असा दावा इंडियन एक्सप्रेसने त्या गोपनिय कागदपत्रांच्या आधारे केला आहे.

तसेच २३ नोव्हेंबर २०१५ रोजी, विजय मल्ल्या दिल्लीमध्ये येणार आहे याची पूर्वसूचना देण्यात आली होती. त्यावर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २४ तारखेला मुंबई पोलिसांना पत्र लिहून, विजय मल्ल्याला ताब्यात घेण्याची गरज नाही, जर गरज पडली तर नंतर त्याला ताब्यात घेता येऊ शकतं, असं नमूद करण्यात आलं होतं. याचाच अर्थ मल्ल्याविरोधात अलर्ट असूनही सीबीआय’ने काहीच माहिती नसल्याचं सोंग घेतल्याचं स्पष्ट निदर्शनास येत आहे. या पत्रावर मुंबई सीबीआयचे एसपी हर्षिता अटलुरी यांची स्वाक्षरी सुद्धा होती. तसंच मुंबई आयपीएस अधिकारी असवती दोर्जे यांना सुद्धा याची प्रत मिळाली होती. या प्रकरणावर इंडियन एक्सप्रेसने अटलुरी यांच्याकडे प्रतिक्रिया मागितली असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे या प्रकरणात पितळ उघडं पडण्याची शक्यता आहे.

Indian Express group made disclosed fact behind Vijay Mallya and CBI Notice