रत्नागिरी : विरोधी पक्ष आणि स्थानिक नागरिकांसह संपूर्ण कोकणातून जोरदार विरोध होत असलेला नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द करण्याची आज अधिकृत घोषणा केली आहे. तसेच या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

दरम्यान, नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याबाबत प्रसार माध्यमांना माहिती देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की,”स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेली शेतकऱ्यांची जमीन त्यांना परत देेण्यात येईल. तसेच जमिनींच्या सातबारावर असलेला एमआयडीची शिक्काही हटवण्यात येईल. त्याबरोबरच आता ज्या भागात या प्रकल्पासाठी स्थानिक जनता अनुकूल असेल, अशा ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येईल.”

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीच घोषणा करावी अशी जोरदार मागणी मागील काही महिन्यांपासून करण्यात येत होती. स्थानिकांच्या संघर्ष समितीने देखील नाणार प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच नाणार परिसरातील रहिवासी, मुंबईकर मंडळी आणि कोकणातील पर्यावरण प्रेमींनी या प्रकल्पाविरोधात तीव्र भूमिका घेतली होती.

Konkan nanar refinery project is finally cancelled and officially announced by state government