मुंबई : वयाच्या सातव्या वर्षीच देशातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून केवळ देशातच नव्हे तर परदेशी स्पर्धकांवर सुद्धा साईश्वरने छाप पाडली आहे. अल्पावधीतच साईश्वर गुंटूक’ला लोकं ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ या नावाने ओळखू लागले. मूळचा सोलापूरचा असलेला साईश्वर केशव गुंटूकचे सातव्या वर्षातील विक्रम बघितल्यावर थक्क व्हाल असच त्याच कर्तृत्व आहे. एकदा सहज म्हणून फिरायला कोल्हापूरला आला आणि धावण्याची हौस म्हणून पहिल्यांदा त्याने कोल्हापूर येथील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा त्याने सहज खिशात टाकली. परंतु तिथेच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्यानंतर त्याने मध्य प्रदेशातील हिल मॅरेथॉन ही अवघड स्पर्धा जिंकली.

त्यानंतर साईश्वरने पुण्यातील एच २० मॅरेथॉन ही १० किलोमीटरची स्पर्धा केवळ ५८.०६ मिनिटात पार केली आणि सर्व दिग्गज स्पर्धकांना विचार करायला भाग पाडलं. त्यानंतर साईश्वरने हैद्राबाद मधील लव्ह स्पर्धेत अनेक दिग्गजांना धूळ चारली आणि मेडलवर स्वतःच नाव कोरल. तर पंजाब मधील नॅशनल सोलन हाफ डोंगरी मॅरेथॉन ही ११ किलोमीटरची स्पर्धा त्याने अवघ्या २.०३ तासात जिंकून जागतिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना डोक्याला हात लावायची वेळ आणली. त्याचवेळी पंजाबच्या क्रीडामंत्र्यांच्या हस्ते साईश्वरला ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आलं.

चिमुकल्या साईश्वरची सातव्या वर्षातील कीर्ती अशी झाली की लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेत जिथे संपूर्ण देशातून म्हणजे तामिळनाडू, पंजाब, आसाम, हरियाणा, मुंबई, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यातून खेळाडू भाग घेत असताना साईश्वरला त्या स्पर्धेचा ‘ब्रँड अम्बॅसिडर’ करण्यात आलं. तिथे छोट्या साईश्वरला मुख्य अतिथी हा मान मिळाला. आगामी मुंबई मान्सून आणि जम्मू मॅरेथॉन स्पर्धेत सुद्धा साईश्वर ‘ब्रँड अम्बॅसिडर’ असणार आहे. बर साईश्वर इथेच थांबला नाही कारण मुंबईमध्ये मे महिन्यात मुंबईमध्ये पार पडलेल्या ‘रन फॉर ट्राय’ मध्ये भाग घेतला आणि त्याच्या धावण्याचा वेग पाहून ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इंडोनेशिया आणि आयर्लंड मधील स्पर्धक सुद्धा अवाक झाले. त्यामुळे हा छोटा जवान पुढे काय पराक्रम करू शकतो त्याचा अंदाज येऊ शकतो.

परंतु जे इतर राज्यांना आणि परदेशातील स्पर्धकांना कळत आहे ते आपल्या महाराष्ट्रातील राजकारण्यांना समजत नसल्याचे चित्र आहे. अगदी सोलापुरातील स्थानिक राजकारणी सुद्धा साईश्वरला केवळ शुभेच्छा देऊन वेळ मारून घेत आहेत असच काहीस चित्र आहे. राज्य सरकारच्या दरबारी मात्र साईश्वरच्या कुटूंबाला निराशाच पदरी पडत आहे. अखेर काल साईश्वरचे वडील मोठ्या आशेने सोलापुरवरून सकाळच मुंबईला पोहोचले आणि कृष्णकुंजच्या गेटवर प्रतीक्षा करत होते. महाराष्ट्रानामा न्यूज’च्या प्रतिनिधींना एक लहान ६-७ वर्षाचा मुलगा आणि सोबत एक ३५-४० च्या वयातील व्यक्ती बाहेर थोडी बिथरलेल्या चेहऱ्याने दिसली. महाराष्ट्रानामा न्यूज’च्या प्रतिनिधींना सहज त्यांच्याकडे विचारणा केली, कारण त्या मुलाचे केस आणि शरीर थोडं पावसाने भिजलेलं होते. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की मी केशव गुंटूक सोलापुरवरून सकाळच आलो आहे. मुलाची आणि माझी राज ठाकरेंना भेटायची इच्छा होती, परंतु अपॉइंटमेंट घेतलेली का अशी विचारपूस केल्यावर ते म्हणाले की मला याची काहीच कल्पना नव्हती.

आमच्या प्रतिनिधींच्या या प्रश्नाने ते नाराज झाले आणि त्यांना वाटलं की भेट शक्य नाही होणार. त्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी सर्व विषय समजून घेतला आणि साईश्वरचे भीम पराक्रम पाहून आम्हाला सुद्धा धक्का बसला. परंतु सरकार दरबारी निराशेने कंटाळला पिता जेव्हा असं म्हणाला की ‘माझी पत्नी तर हे सर्व थांबवावं’ असं म्हणत आहे. कारण आमचा मुलगा गुणवान असला तरी आम्ही गरीब आहोत आणि सरकार दरबारी पाठपुरावा करून सुद्धा आमची काहीच दखल घेतली जात नसल्याने साईश्वरच्या मेहनतीला भविष्यात उपयोग तरी काय? अशी खंत व्यक्त केली.

राज ठाकरेंकडे आलो होतो थोड्या अपेक्षेने की ते सरकार दरबारी साईश्वरसाठी काही पाठ पुरावा करतील, परंतु आज भेट होईल असं वाटत नाही कारण आमच्याकडे अपॉइंटमेंट नाही, मग जावंच लागेल परत सोलापूरला पुढचा गाडीने. आधीच महिन्याला १८ हजार पगार आणि त्यात सुद्धा भाड्याच्या घरात आणि आजारपणावर सर्व पैसे खर्च होत आहेत. देशात नावलौकिक मिळवणारा माझा मुलगा, बरेच जण येतात आणि डायट करा आणि हे करा आणि ते करा म्हणून सल्ले देतात. पण त्याला कसलं डायट आणि कसलं काय, जे ताटात पडत ते जेवतो, पण गरीब आईबाप जे प्रेमाने खाऊ घालतात त्यात सर्व स्पर्धकांना चितपट करतो.

जीव एवढ्या साठीच तुटतो कारण आपल्या लोकांनाच आपल्याकडच्या गुणवत्तेची कदर नाही आणि त्यात माझा मुलाची गुणवत्ता आणि स्वप्नं धुळीला मिळतील. काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी एका बॅडमिंटन पटू मुलीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा केल्याची बातमी वाचली होती. म्हणून म्हटलं चला जाऊन एक प्रयत्नं करायला काय जातंय मुलासाठी आणि मुलगा सुद्धा खुश झाला राज ठाकरेंना भेटायचं म्हटल्यावर. इथे भल्या पहाटे आलो सोलापूरवरून आणि कृष्णकुंज वर एवढ्या सकाळी कस जायचं म्हटलं आणि मुलाला जवळच्या समुद्र किनाऱ्यावर घेऊन गेलो आणि तितक्यात पाऊस आला आणि त्यात माझा मुलगा भिजला पण मुंबई पाहून खुश होता. आता कृष्णकुंजवर परत आलो आणि समजलं की अपॉइंटमेंट शिवाय भेटता येणार नाही. आमच्या प्रतिनिधीने ही सर्व कथा त्या बापाच्या तोंडून ऐकली आणि राहवलं नाही, परंतु वेळ बेहत्तर तर सर्वच सुमंगल.

चिमुकल्या साईश्वरचा चेहरा पडलेला, कारण राज ठाकरेंची भेट होणार नाही आणि पुन्हा सोलापूरला परतावं लागणार. ते तिथून निघण्याच्या तयारीत असतानाच सुदैवाने त्याच मिनिटाला अमित ठाकरे काही कामा निमित्त गेट बाहेर आले आणि महाराष्ट्रानामा न्यूज’च्या प्रतिनिधींनी अमित ठाकरेंना विनंती केली आणि त्यांना साईश्वरची अडचण लक्षात आणून दिली. अमित ठाकरेंनी आत मेसेज पाठवला आणि साईश्वरला अपॉइंटमेंट नसताना सुद्धा राज ठाकरेंकडे घेऊन जाण्यात आलं. पुढे काय संवाद झाला माहित नाही, परंतु महाराष्ट्रनामा न्यूज’चे प्रतिनिधी बाहेर होते, त्यांना थोडक्यात विचारले असता ते म्हणाले की ‘असे कसे साईश्वरला ते संधी देत नाहीत?….मी बोलतो!’ अस राज साहेब म्हणाले आणि मी त्यांचे आभार मानून बाहेर पडलो. पण ते आमच्या प्रतिनिधिला सुद्धा न विसरता धन्यवाद म्हणाले. परंतु त्यांची आणि साईश्वरची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना न भेटताच परतावे लागले नाही याचा आनंद झाला.

Little champion and record maker Saishwar Guntuk meet MNS Chief Raj Thackeray