लांजा : लोकसभा निवडणुकीआधी कोकणात शिवसेनेला सोडचिट्ठी देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. सत्तेत विराजमान असलेल्या शिवसेनेबद्दल कोकणात विनाशकारी नाणार रिफायनरी प्रकल्प आल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाला आहे. त्याचा फटका शिवसेनेला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसायची शक्यता आहे.

कोकणातून शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदार असतानासुद्धा विकासाबाबत जैसे थे परिस्थिती आहे असा स्थानिकांचा आरोप आहे. तर दुसरीकडे नव्याने स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संपूर्ण कोकणात भक्कम पाय रोवताना दिसत आहे. स्वतः खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे कोकणात ठाण मांडून पक्ष विस्तार आणि पक्ष बांधणी मजबूत करताना दिसत आहेत. परिणामी, स्थानिक शिवसैनिकांची ओढ त्याबाजूला झुकताना दिसत आहे.

त्याचाच परिचय लांजा तालुक्यात आलं आहे. जिथे संपूर्ण गावच्या गाव शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश करत आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर निर्णायक ठरणार कुणबी मतदार सुद्धा आहे हे विशेष. लांजा तालुक्यातील आगवे जोशीगाव येथील शेकडो शिवसैनिक व कुणबीसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे आगवे जोशीगावामध्ये शिवसेनेला खिंडार पडले आहे. त्यामुळे महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आता गावोगावी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडून त्यांना स्वतःच्या पक्षात सामावून घेण्याची योजना आखात आहे. कोकणातील शिवसेनेची कार्यकर्त्यांची फळीच कमजोर करण्याची योजना खासदार नारायण राणे आखात असल्याचे समजते.

many shivsena workers enters in maharashtra swabhiman party at lanja