पुणे : आज पुण्यामध्ये पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र चर्चा रंगली ती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याच्या सिंचन क्षेत्रातील मांडलेल वास्तव, जे अजित पवारांना झोंबल्याचे पाहायला मिळालं.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सिंचन क्षेत्रा विषयी बोलताना आजवरच्या राजकीय कुरघोड्यांमुळे सिंचनाचा विकास आणि गावचा विकास झाला नसल्याची प्रतिक्रिया दिली. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे माध्यमांचे लक्ष लागून राहिले होते.
प्रथम राज ठाकरे यांनी अमीर खानने पाणी फाऊंडेशनमार्फत केलेल्या जनजागृती अभियानाच कौतुक केलं आणि त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी मागील सरकारच्या आणि विद्यमान सरकारकडे बोट दाखवत राज्यातील सिंचन क्षेत्रातलं वास्तव उपस्थितांसमोर मांडल आणि नेमकं तेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झोंबल्याचे पहावयास मिळाले.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे सिंचन क्षेत्राविषयी बोलताना;
आज इथे दोन्ही सरकारमधील नेते उपस्थित आहेत. राज्याचा गेल्या ६० वर्षातील सिंचनाचा पैसा नेमका गेला कुठे? जर राज्यातील पाण्याबाबतची जनजागृती आणि जवाबदारी जर अमीर खान पार पाडणार असेल आणि मागील ६० वर्षात जर इरिगेशन विभागात पैसा मुरला नसता तर राज्यातील पाणी पातळी कमी झाली नसती असं विधान करत राज ठाकरे यांनी मागील तसेच विद्यमान सरकारला खडा सवाल केला.
तसेच उपस्थितांना ‘मी श्रमदानाला नक्कीच येईन, कुदळ कशी मारायची मला माहित आहे, फावडे कसं मारायच ते तुम्ही मला शिकवलं असं राज ठाकरे म्हणाले.
