मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अमित ठाकरे यांचा विवाह मिताली बोरूडेशी होणार असून नातेवाईक आणि जवळच्या मोजक्या मंडळींना आमंत्रित करत लग्न अगदी साध्या पद्धतीने करणार असल्याचे राज ठाकरे यांनी याआधीच सांगितले होते. त्यामुळे घरातील आणि नात्यांमधील ती मोजकी मंडळी कोण याची सरावांनाच उत्सुकता होती.
दरम्यान, राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उद्योगमहर्षि रतन टाटा यांना लग्नाचे आमंत्रण दिल्याचे समोर आले आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’वर सध्या लगीनघाई जोरात सुरू आहे. अमित आणि मितालीचे लग्न २७ जानेवारीला लोअर परळ येथे होणार आहे. नाशिक दौ-यावर असतानाच राज ठाकरे यांनी मुलाची लग्नपित्रका सप्तश्रृंगी देवीचरणी अर्पण केली होती. तर मंगळवारी सकाळी राज सपत्निक सिद्धीविनायक दर्शनाला गेले होते. यावेळी दर्शन घेत त्यांनी लग्नपत्रिका बाप्पाचरणी अर्पण केली.
त्यानंतर राज आणि शर्मिला लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी रतन टाटा यांच्या घरी गेले. राज ठाकरे आणि रतन टाटा यांचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. दरम्यान, नाशिक मधील बोटॅनिकल गार्डन ही संकल्पना रतन टाटा यांच्या आर्थिक मदतीमधून शक्य झाली होती आणि रतन टाटा यांनी प्रत्यक्ष नाशिक येथे भेट देऊन राज ठाकरे यांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे राज ठाकरे या एका व्हिजनरी राजकारण्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध राहिले आहेत. त्याचाच प्रत्यय या निमंत्रणातून आला आहे.
