मुंबई : काँग्रेस तसेच डाव्या पक्षांनी देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या तसेच एकूणच वाढलेल्या महागाईविरोधात आज भारत बंद पुकारला आहे. आज सकाळ पासूनच प्रतिक्रिया उमटू लागल्या असून अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच बसेस अडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज दिवसभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जवळपास देशभरातील एकूण ३१ पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा दिला असला तरी महाराष्ट्रात मनसेने सक्रिय पाठिंबा दिल्याने राज्यात मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
मुंबईमध्ये जनजीवन सुरळीत असलं तरी आता बंदचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. शाळा कॉलेजेस सुद्धा सकाळपासून सुरळीत सुरु आहेत. ठाण्यात मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींकडून जाळपोळ करण्यात आली असून वाहनांच्या टायर्सची हवा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. विरारमध्ये खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर भारत बंदला पुण्यात हिंसक वळण लागले असून पीएमपीच्या बसची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यातील कुमठेकर रस्त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी पीएमटी बस फोडली. काँग्रेस कार्यकर्ते अंधेरी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उतरुन घोषणाबाजी केली. तर चेंबूरमध्ये भारत बंदला हिंसक वळण लागलेलं पाहायला मिळत असून येथे ४० ते ४५ गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती आहे.
मनसे कार्यकर्त्यांनी थेट भांडुप रेल्वे स्थानक गाठत रेलरोको केल्याने पोलिसांची मोठी धावपळ झाल्याचे चित्र होते. आंदोलकांनी भांडुप रेल्वेस्थानक घोषणांनी दणाणून सोडलं होत. त्यामुळे काहीकाळ रेल्वे सेवेवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
