कोलकत्ता : गंगा नदीच्या शुद्धीकरणावरुन जागतिक ख्यातीचा रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते आणि विख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मोदींनी गंगा शुद्धीकरणासंदर्भात दिलेले आश्वासन त्यांनी पाळलं नाही. कारण गंगा नदीचे पाणी अत्यंत दुषित झाले आहे’, अशी व्यथा त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, राजेंद्र सिंह हे गंगा सद्भावना यात्रेनिमित्त कोलकात्यात असून बुधवारी त्यांनी कोलकात्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुक्त संवाद साधला. त्यावेळी गंगा नदीच्या वादावर ते म्हणाले, मोदींच्या सत्ताकाळात केवळ भांडवलशाहीवर आधारित लोकशाही उरली आहे. त्यामुळे लोकांना नदीत निर्माल्य टाकल्यास अटक तर होते, परंतु स्थानिक उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात गंगा नदीत दुषित आणि रसायनयुक्त सांडपाणी मोठ्याप्रमाणावर सोडले जाते. परंतु, हे सर्व खुलेआम होत असताना संबंधित कंपन्यांवर कोणतीही कारवाई प्रशासनाकडून होत नाही, असे त्यांनी मुख्यत्वे नमूद केले.
गंगा नदी सद्य ICU मध्ये असून ‘नमामी गंगे’ या योजनेमुळे नदीचे अजिबात शुद्धीकरण होऊ शकलेले नाही. तसेच या योजनेअंतर्गत केवळ गंगा घाटांचा पुनर्विकास करण्यात आला. परंतु, गंगा नदीचे शुद्धीकरण हे अजून सुद्धा केवळ स्वप्नच आहे, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. आधी मोदींनी गंगा नदी माते समान असल्याचे सांगितले. त्यांनतर ३ महिन्यात गंगा नदीचे शुद्धीकरण सुरु करण्याचे आश्वासन सुद्धा दिले. परंतु अजून सुद्धा त्यांनी त्यासाठी ठोस असं काहीच केले नाही. त्यामुळे गंगा नदीची अवस्था सध्या अत्यंत दयनीय आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता गंगानदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी मोदी सरकार पुन्हा काही नाही निवडणुकीची घोषणा करणार का हेच पाहावं लागणार आहे.
