औरंगाबाद : सध्या दुष्काळाने हैराण झालेल्या मराठवाड्यातून एक धक्कादायक बातमी समोर आले आहे. भाजप-शिवसेना सरकारच्या राजवटीत मराठवाड्यातील बळीराजाचे आत्महत्याचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे निदर्शनास येते आहे. कारण, पावसाच्या अभावामुळे घेतलेल्या पिकांचे होणारे नुकसान तसेच अंगावरील वाढता कर्जाचा बोजा, तसेच मोठ्या दुष्काळामुळे सततची नापाकी आणि त्यात प्रपंचाची चिंता, अशा दयनीय अवस्थेत अडकलेल्या बळीराजासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे समोर येत आहे.

केवळ जानेवारी ते नोव्हेबंर या ११ महिन्यात मराठवाड्यातील तब्बल ८५५ शेतक-यांनी त्यांची जीवनयात्रा संपवल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच प्रशासकीय स्तरावर ५३२ प्रकरणे पात्र तर २४० प्रकरणे अपात्र ठरली असून ८३ प्रकरणे केवळ चौकशीसाठी प्रलंबित आहे. त्यामुळे बळीराजाची अवस्था किती भीषण आहे याचा प्रत्यय येतो आहे.

अवर्षणग्रस्त मराठवाड्यात मागील ४ ते ५ वर्षापासून वरुण राजाची अनियमितता असल्याने बळीराजाला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे असे निदर्शनास येते आहे. त्यातच यंदाही पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने आणेल विभागात मोठ्या दुष्काळ पडला आहे. अशा भीषण परिस्थितीमुळे हजारो हेक्टर जमिनीवर घेतलेल्या पिकांचे पाण्याअभावी योग्य वाढ होत नाही आणि परिणामी अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, त्यात पिकांवर पडणा-या विविध प्रकारच्या रोगराईमुळे पिकांसाठी बँका आणि सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे परत करता येईल, अशा चिंतेने बळीराजा मोठ्या पेचात पडल्याचे दिसते आहे.

सुरुवातीला म्हणजे जुन महिन्यात पडलेल्या पावसाने काही प्रमाणात परिस्थिती सुधारेल असे वाटले होते. परंतु, त्यानंतर वरुण राजाने तब्बल २ महिन्याची दांडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यानंतर विभागात सर्वञ दुष्काळ पसरला असून हाती येणारे पीक वाया गेल्याने बळीराजाच्या चिंतेत प्रचंड मोठी भर पडत आहे. आणि आर्थिकरित्या हैराण झालेला बळीराजा अखेर आत्महत्येचा मार्ग पत्करताना दिसत आहे.

more than eight hundred farmers suicides in marathwada because of drought