मुंबई : स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. केंद्रात आणि राज्यात डझनभर मंत्रिपद उपभोगून सतत सहकारी पक्ष भाजपवर विखारी आगपाखड करणारे शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन पलटले आहेत. दरम्यान संपूर्ण सत्ताकाळ राजीनामा नाट्यात व्यर्थ घालवल्यानंतर मागील काही महिन्यापासून अनेक वेळा स्वबळाच्या जाहीर घोषणा देखील स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत.
सत्ताकाळात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केवळ बाता मारून मराठी माणसाची घोर फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच मुंबईची महानगरपालिका अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असून येथे घर खरेदी करणे मराठी माणसाला शक्य झाले नाही. शिवसेनेकडून जे काही झालं ते केवळ मातोश्रीच्या हिताचं झालं आणि त्यात मराठी माणसाचं कोणताही हित नसल्याचा घणाघात यावेळी खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
तसेच आमचा पक्ष ज्या मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवेल तिथे तो पूर्ण ताकदीने शिवसेना उमेदवाराच्या विरोधात जिंकण्यासाठीच मैदानात उतरेल असे देखील यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात सर्वच पक्ष शिवसेनेवर तुटून पडतील अशी शक्यता आहे.
