नागपूर : मागील चार दिवसांपासून सुरु असलेले दूध आंदोलन अखेर मागे घेण्याचा निर्णय राजू शेट्टी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर राजू शेट्टी ही अधिकृत घोषणा केली आणि अखेर सरकारचा जीव भांड्यात पडला आहे.
सरकारच्या निर्णयाचं स्वागत करताना राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही प्रसंगी सरकारशी भांडतो परंतु दूध दराबाबतच्या सरकारच्या निर्णयाचं सुद्धा आम्ही मोठ्या दिलाने स्वागत करतो आणि या क्षणाला दूध आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेत आहोत. त्यामुळे उद्यापासून सुरळीत दूध पुरवठा होईल अशी घोषणा करण्यात आली.
राज्य सरकारने दुधाला २५ रुपये प्रति लिटर भाव देण्याचा निर्णय घेतला असून, सरकार दूध संघांना लिटरमागे ५ रुपये अनुदान देणार आहे. तसेच या नव्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या २१ जुलै पासूनच करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या अनुदानामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर प्रति महिना ७५ कोटींचा बोजा पडणार आहे.
