मुंबई : माजी पंतप्रधान दिवंगते अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्टलाच झाले होते की, त्या दिवशी त्यांच्या निधनाची केवळ घोषणा करण्यात आली होती, अशी शंका शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. अटलजींचा श्वास साधारण १२-१३ ऑगस्टपासून मंदावला होता. परंतु पंतप्रधानांच्या स्वातंत्र्य दिनादिवशीच्या भाषणात अडथळा नको, स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको या विचाराने वाजपेयींनी १६ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला किंवा त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली अशी राऊतांनी उपरोधिकपणे शंका उपस्थित केली आहे.
शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून खासदार संजय राऊत यांनी ही शंका व्यक्त केली आहे. १६ ऑगस्टला सांयकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयाने अटलजींच्या निधनाची अधीकृत घोषणा केली होती. त्याला अनुसरुनच सामना’च्या लेखातून त्यांनी भाजप तसेच मोदींवर निशाणा साधला आहे.
आजच्या लेखात संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘स्वराज्य म्हणजे काय हे जनतेपेक्षा आपल्या राज्यकर्त्यांनी आधी समजून घेतले पाहिजे. वाजपेयींचे निधन १६ ऑगस्ट रोजी झाले. पण त्यांची प्रकृती १२-१३ ऑगस्टपासूनच बिघडली होती. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको आणि लाल किल्ल्यावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवायला नको, तसेच पंतप्रधान मोदींचेही लाल किल्ल्यावरून सविस्तर भाषण व्हायचे होते. या राष्ट्रीय विचाराने वाजपेयींनी १६ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला (किंवा त्यांच्या निधनाची घोषणा केली).
