मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेते एकमेकांवर टीका करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात टीका केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बारामतीचा पोपट’ असा त्यांचा उल्लेख केला होता. राज ठाकरेंची भाषणं बारामतीहून येतात अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तेव्हापासून मनसे आणि भाजपा नेत्यांमध्ये डिजिटल युद्ध पेटलं आहे.
ट्विटरच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. यावेळी त्यांनी मनसेचे जुन्नरचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी पक्षाला रामराम केल्यावरुनही टोला लगावला आहे. शरद सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, ‘सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन.. बारामतीच्या काकांनी “फक्त लढ” असे म्हटले.!! “शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे”.
नेमकं काय ट्विट केलं आहे आशिष शेलार यांनी
सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन.. बारामतीच्या काकांनी “फक्त लढ” असे म्हटले.!!
“शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे”#ChokidarकेSideEffects— Chowkidar ashish shelar (@ShelarAshish) March 28, 2019
