नागपूर : भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसने चांगलाच धोबीपछाड दिला आहे. नितीन गडकरी यांचे मूळ गाव धापेवाडा तसेच त्यांनी दत्तक घेतलेले ‘पाचगाव’ या दोन्ही ठिकाणच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेद्वारांनी बाजी मारली आहे. दोन्ही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला काँग्रेसने धूळ चारली आहे. विशेष म्हणजे धापेवाडा येथे एकूण १७ पैकी भाजपच्या हाताला एकही जागा लागली नसून सर्वच उमेद्वारांना काँग्रेसने धूळ चारली आहे.

दिग्गज नेते नितीन गडकरींच्या गावात भाजपला साधं खाते सुद्धा उघडता आलेले नाही. नागपूरमध्ये भाजपचा असा दारुण पराभव पहिल्यांदाच होत नसून, याआधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्त घेतलेल्या फेटरी गावात आणि त्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुरादेवी या गावातसुद्धा गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला होता.

त्यामुळे भाजपला आगामी निवडणुकीपूर्वी ग्रामीण भागातून धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे असच म्हणावं लागेल. धापेवाडा येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी झालेल्या लढतीत काँग्रेस पुरस्कृत सुरेश डोंगरे यांनी भाजप पुरस्कृत संजय शेंडे यांचा दारुण पराभव केला आहे. तसेच पाचगाव येथे काँग्रेसच्या उषा गंगाधर ठाकरे यांनी भाजप समर्थित रजनी लोणारे यांचा पराभव करून सरपंचपदावर शिक्कामोर्तब केले आहे. पाचगाव येथे गटबाजीमुळे भाजपच्या ४ बंडखोर महिला रिंगणात होत्या.

विशेष म्हणजे नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं केंद्र बिंदू आहे आणि त्यात भाजपचे केंद्रातील दिग्गज नेते नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी दिग्गज मंडळी नागपूरची असून सुद्धा भाजपवर मतदार विश्वास टाकण्यास तयार नसल्याचे नागपूर ग्रामीण भागातील एकूणच चित्र आहे.

nagpur bjp has lost all seats in central minister nitin gadkaris native village