खडकवासला : राज्याचा ग्रामीण भाग सध्या प्रचंड दुष्काळाने ग्रासला आहे आणि मराठवाड्यात तर परिस्थिती फारच कठीण आहे. त्यामुळे मराठवाड्यात जर एक मूठ धान्य व एक पेंडी चारा सर्वांनी दिला तर मराठवाड्यातील जनावरांना आणि होरपळणाऱ्या माणसांना मोठा हातभार लागेल. केवळ नाइलाजास्तव ग्रामीण भागातील लोकं आज मोठ्याप्रमाणावर शहरात येत आहेत, ती काही भिकारी नाहीत. त्यामुळे त्यांना भिक्षुकांसारखी वागणूक अजिबात देऊ नका, असे जाहीर आवाहन नाना पाटेकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना केले.
देशाच्या राजधानीत म्हणजे दिल्लीत सुद्धा भव्य शेतकरी मोर्चा निघाला. त्यामुळे हे सर्व पाहता शेतकऱ्यांना संस्थांनी सुद्धा सढळ हाताने मदत करावी. कोणतेही सरकार मदत करत असते परंतु ती नेहमीच कमी पडते आणि त्यामुळे सामाजिक संस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन मदत करायला हवी असे सुद्धा नाना पाटेकरांनी मत व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाचं पाटबंधारे खातं आणि ग्रीन थंब या समाजसेवी संस्थेच्या एकत्रित उपक्रमातून खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्याच्या चौथ्या टप्प्याचे आज उद्घाटन करण्यात आले त्यावेळी नाना पाटेकरांनी उपस्थितांना संबोधित केले. दरम्यान, या कार्यक्रमाला अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी नाम फाऊंडेशनकडून ५ पोकलन या सुद्धा या स्तुत्य उपक्रमासाठी मोफत देण्यात आले. आपण निसर्गाशी छेडखनी केल्यास आपल्याला निसर्ग सुद्धा आपल्याला तेच देणार अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या कार्यक्रमावेळी नाना पाटेकरांनी प्रश्न विचारण्यात आला की, ‘आपल्याकडे राम मंदिरावर चर्चा होते’, परंतु दुष्काळावर अजिबात चर्चा होत नाही. त्यावर नाना पाटेकर यांनी उत्तर दिलं की, “कुणी काय करायचे हे त्यांच्यावर आहे, मात्र मला जे करावेसे वाटते ते मी करतो. गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटेल, त्यामुळे तुम्हाला मंदिर बांधयाचे असेल तर तुम्ही खुशाल बांधा. पण मला स्वतःला जे काम करायचे आहे ते मी करत आहे, असे उत्तर नाना पाटेकरांनी दिले.
