नवी दिल्ली : यूपी आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसशी येथील अनुक्रमे बहुजन समाज पार्टी – समाजवादी पार्टी आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसशी आघाडी होण्याची काहीही चिन्हे नसली तरी इतर राज्यांतील प्रादेशिक पक्ष मात्र राष्ट्रीय काँग्रेसशी आघाडी करण्यास तयार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्याविरोधात लढण्यासाठी काँग्रेसने ७ राज्यांत तिथल्या प्रादेशिक पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रमुख राज्यांमध्ये दक्षिणेतील ४ राज्य ज्यामध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या प्रमुख राज्यांचा समावेश आहे. तर उत्तरेकडून बिहार आणि झारखंडचा समावेश आहे. तर भाजपसाठी महत्वाचा असलेल्या जम्मू-काश्मीरचा समावेश आहे.
या राज्यांतील प्रबळ पक्ष काँग्रेसशी आघाडी करायला पूर्ण तयार असल्याचे समजते. तामिळनाडूतील द्रमुक, आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडूंचा सत्ताधारी तेलगू देसम, कर्नाटकात जनता दल (सेक्युलर), केरळमधील काही स्थानिक प्रादेशिक पक्ष, बिहारमध्ये लालू यादवांचा आरजेडी तसेच जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक समता पक्ष आणि जम्मू-काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स यांची काँग्रेसशी आघाडी झाल्यात जमा आहे.
केवळ त्यांच्यात जागावाटपाची महत्वपूर्ण बोलणी होणे शिल्लक आहे. परंतु, त्यात अडचणी येणार नाहीत, असे राष्ट्रीय काँग्रेसचे म्हणणे आहे. आघाडीतील पक्षांच्या साथीने तब्बल ४०० जागा लढवण्याच काँग्रेसच ध्येय असल्याचे आहे.
