पुणे : मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिस्ती धर्मीयांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे भाजपवर चारही बाजूने टीकेचा भडीमार होत असताना, आता राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांनी सुद्धा भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप नेत्यांना शरम वाटली पाहिजे,’ अशा तिखट शब्दात शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात कोणी काय खावे आणि कोणते कपडे घालावेत अशा मुद्द्यांवरून देशातील वातावरण खराब करण्यात येत असल्याचा आरोप पवारांनी भाजपवर केला आहे. त्यात काल भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिस्ती धर्मीयांबाबत केलेली विधाने सुद्धा निंदनीय आहेत असं पवार म्हणाले.
संबंधित विषयावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार म्हणाले की,’ स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काँग्रेसची स्थापना झाली असून, त्यामध्ये अॅनी बेझंट यांचे देशासाठी महत्वाचे योगदान होते. त्यामुळे अशी विधाने करताना भाजपच्या त्या नेत्यांना शरम वाटली पाहिजे, अशी जळजळीत टीका शरद पवार यांनी केली. एनसीपी’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ईद मिलन कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, अब्दुल गफार अब्दुल रज्जाक, चेतन तुपे, पी. ए. इनामदार आदी उपस्थित होते.
तसेच आज ख्रिस्ती, शीख, मुस्लिम धर्मियांविरुद्ध खुलेआम काही सुद्धा बोलले जाते आहे. परंतु समाजातील सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा विचार मांडणाऱ्या हिंदू धर्मीयांविरुद्धही बोलणाऱ्या शक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे असं पवार उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले.
