ठाणे : एनसीपीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. ठाणे शहरातील कचऱ्याच्या व्यवस्थापनात प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असून ठाण्याच्या कचऱ्यावरच सत्ताधारी शिवसेना पोसली जात असल्याचा गंभीर आरोप ठाणे महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि एनसीपीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.
दरम्यान, ठाणे महानगर पालिकेने कचरा उपविधीच्या नावाखाली ठाणेकरांवरील कचरा कर वाढविण्यात आला असून महापालिका स्वतः कचरा व्यवस्थापनात अयशस्वी ठरत असताना सर्वसामान्य ठाणेकरांवर त्याचा सक्तीने भार टाकण्यात येत आहे असा आरोप त्यांनी आहे. तसेच ठाणे शहरातील सामान्यांची ही लूट थांबविण्याची मागणी करतानाच त्यांनी कचऱ्याच्या कामांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराची सुद्धा चौकशी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करू तसेच गरज भासल्यास जनहित याचिका सुद्धा दाखल केली जाईल असं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, महसूल वाढीच्या नावाखाली कचरा सेवा शुल्काबाबतचा अधिकृत ठराव सप्टेंबर महिन्यात झालेल्या स्थायी समितीच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला होता. तेव्हाच ही करप्रणाली आणि एकूणच ठाणे शहरातील कचरा व्यवस्थापनातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी मिलिंद पाटील यांनी ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी सूचना सुद्धा मांडली होती. परंतु, त्यावेळी सत्ताधारी शिवसेनेने ही सूचना चर्चेसाठी सुद्धा घेतली नाही. अखेर संतापलेल्या एनसीपीने मंगळवारी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.
