मुंबई : ओबीसी समाजाला भुजबळांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यां विरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्नं यशस्वी झाल्यास भाजप बरोबर शिवसेनेची सुद्धा डोकेदुखी वाढू शकते. कारण राज्यात ४० टक्क्यांच्या घरात लोकसंख्या असलेला ओबीसी समाज जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एकवटला तर आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कारण छगन भुजबळ जामिनावर बाहेर येताच ओबीसी समाजाचे राजकारण आता तापू लागलं आहे. त्यात भाजप शिवसेनेच्या राज्यात ओबीसी समाजावर अन्याय झाल्याच्या बातम्या जोर धरू लागल्या आहेत. त्यात भाजपचे एकनाथ खडसेंसारखे जेष्ठ नेते सुद्धा भाजपामध्ये ओबीसी नेत्यांना डावललं जात असल्याचा आरोप करत भाजपच्या अडचणीत वाढ करत आहेत. इतकंच नाही तर खडसेंनी ओबीसींच्या लढ्यासाठी भुजबळांच्या मदतीला उभं राहण्याची घोषणा सुद्धा केली आहे.

त्यात राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत उपस्थितांना संबोधित करताना छगन भुजबळ यांनी विधान केलं होतं की, ओबीसींना आरक्षण मिळावं म्हणूनच तर मी शिवसेना सोडली आणि त्यातूनच शिवसेनेचा ओबीसींच्या आरक्षणाला विरोध होता असा संदेश गेला. त्यामुळे आगामी निवडणुकी जर भाजप आणि शिवसेनेला कात्रीत पकडण्यासाठी विरोधकांनी ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा तापविल्यास ४० टक्क्यांच्या घरात लोकसंख्या असलेला ओबोसी समाज निवडणुकीचे निकाल बदलू शकतो.

त्यात मराठा क्रांती मोर्च्याच्या संदर्भात सामना मुखपत्रातून मराठा समाजाची खिल्ली उडविणारं व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याने त्या मुद्याने सुद्धा आगामी निवडणुकीच्या तोंडावर जोर पकडल्यास शिवसेनेसाठी ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण हे दोन्ही मुद्दे डोकेदुखी ठरतील हे वास्तव आहे.

OBC reservation issue may create problems for BJP and Shiv Sena during coming elections in maharashtra