मुंबई : मागील ३ महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभांच्या धडाक्यानंतर आज मुंबईत शिवाजी पार्कवर सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस महाआघाडीत सहभागाची अंतिम भूमिका जाहीर करणार आहेत. एमआयएमचे अध्यक्ष खा. असुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
वंचित बहुजन आघाडीने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश, मराठवाडा आदी भागात घेतलेल्या जाहीर सभांना हजारोंचा जनसागर लोटला होता. त्यानंतर मुंबईतील त्यांच्या सभेला राज्यातून पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मुस्लीम बांधवही सभेला हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले. एमआयएमचे खा. ओवेसी आपल्या भाषणातून काय संदेश देतात, तसेच निवडणुकीची पुढील दिशाही ते जाहीर करणार आहेत. वंचित आघाडीच्या या सभेसाठी मुंबईतील आंबेडकरी वस्त्या आणि मुस्लीम वस्त्यांमध्ये चौकसभा घेण्यात आल्या. मुंबईभर ठिकठिकाणी बॅनर्स, पोस्टर्स झळकली आहेत. सहा डिसेंबरनंतर शिवाजी पार्कवर पुन्हा सर्वत्र निळे, हिरवे, पिवळे झेंडे फडकताना दिसणार आहेत. वंचित आघाडीच्या या सभेला ‘ओबीसी परिषद’ असे नाव देण्यात आले आहे.
दरम्यान, काल प्रकाश आंबेडकरांचा नक्की गेम प्लॅन काय आहे, हेच अद्याप समजत नाही, असा आरोप काँंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यांची एकूण हालचाल ही भाजपसाठी पोषक असल्याचा आरोप काँग्रेस करत आहे.
