अहमदनगर : नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यास तयार नसल्याने तिढा वाढत असताना, आता काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील मुलगा सुजय यांच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींच्या दरबारातील बैठकीचा काहीही उपयोग न झाल्याने आता अंतर्मनाचा आवाज ऐकूनच पुढचा निर्णय घ्यावा लागेल, असे हताश उद्गार विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना काढले.
विखे-पाटील दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला गेले होते. नगरची जागा काँग्रेसला मिळत नसल्यास आपले चिरंजीव सुजय राष्ट्रवादीतून लढायला तयार आहेत, असा प्रस्ताव त्यांनी दिला. मात्र, पवार यांनी सुजय यांना उमेदवारी देण्यास साफ नकार दिल्याचे कळते. त्यामुळे सुजय यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच संदर्भात राधाकृष्ण विखे यांना दिल्लीत बोलावण्यात आले होते. त्यांनी अहमदनगरची जागा काँग्रेसने घ्यावी, असा आग्रह धरला. परंतु, तसे होणार नाही, असे बैठकीत स्पष्ट झाल्याने ते नाराज झाले आहेत.
दरम्यान, सुजय यांचा भाजप प्रवेश थांबवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरूच होते. सुजय यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवावी, असाही प्रस्ताव त्यांना दिला गेला. त्यासाठी एनसीपीच्या नेत्यांशी काँग्रेसकडून संपर्कदेखील साधला गेला. मात्र, हा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांना मान्य असला, तरी एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, पवार यांना हा निर्णय मान्य नसल्याचेही कळते. राष्ट्रवादीचे नेते पवारांशी याबाबत चर्चा करणार आहेत. सुजय १२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
