नवी दिल्ली : जर पंतप्रधान नरेंद्र मोदी राफेल डील प्रकरणात निर्दोष असते तर ते याप्रकरणी आरोप होत असताना ते प्रत्येक गोष्टीच्या चौकशीला तयार झाले असते असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान, राफेल डील प्रकरणात अनिल अंबनी यांच्याकडे जमीन उपलब्ध होती म्हणून रिलायन्स सोबत हा करार करण्यात आला हे धादांत खोटं आहे. कारण दसॉल्ट एव्हिएशनच्या पैशातूनच अनिल अंबानींनी ती जमीन खरेदी केली होती आणि त्यासाठीच दसॉल्ट एव्हिएशनने काही लाख किंमतीच्या रिलायन्समध्ये तब्बल २८४ कोटी रुपयांचे समभाग विकत घेऊन भलीमोठी गुंतवणूक केली होती, असा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

दरम्यान, या व्यवहारासाठी अनिल अंबानींना मोदींनीच ३०,००० कोटींचा फायदा करुन दिल्याचा थेट आरोप सुद्धा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केला आहे. तसेच हे संपूर्ण प्रकरण साधे सरळ असून ते मोदी आणि अनिल अंबानींच्या भागीदारीवर संपते. आणि या संबंधित प्रकरणात केवळ नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी या दोघांनीच मिळून मोठा घोटाळा केला आहे, असं राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले.

अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीची प्रतिवर्षी केवळ ८ लाख ३० हजार रुपयांची उलाढाल असताना या कंपनीत राफेलची निर्मिती करणाऱ्या दसॉल्ट एव्हिएशनने २८४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. याबाबत दसॉल्ट एव्हिएशनच्या सीईओंनी रिलायन्सकडे जमीन असल्याने त्यांच्याशी करार करण्यात आला तर हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडे पुरेशी जमीन नसल्याने त्यांना यात सहभागी करण्यात न आल्याचे सांगितले आहे. मात्र, हे धादांत खोटं असून उलट रिलायन्सने दसॉल्ट एव्हिएशनच्या पैशातून जमीन खरेदी केली आहे असा घणाघात राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केला आहे.

rahul gandhis press conference at delhi on Anil Ambani and Reliance