शिर्डी : सध्या राज्यावर दुष्काळाचं सावट आहे आणि राज्याच्या तिजोरीत सुद्धा खडखडाट असताना केवळ गर्दी जमविण्यासाठी आणि प्रोमोशनसाठी राज्य सरकारकडून मोदींच्या शिर्डीमधील कार्यक्रमावर तब्बल २ कोटीची उधळपट्टी करण्यात आल्याचे समजते. नियोजित ठिकाणी २० हजार घरकुल लाभार्थी कुटुंबीयांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले असून, जवळपास ४० हजार लोक उपस्थित राहण्याचे आयोजन सरकारकडून करण्यात आले आहे.

या महिन्याच्या १९ तारखेला शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या ई – गृहप्रवेश कार्यक्रमास जास्त माणसं जमावीत म्हणून राज्याच्या ग्रामविकास खात्याने तब्बल दोन कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचे समजते. दरम्यान कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना नाश्ता प्रवासाची सोय आणि बसवर बॅनर्स लावून पोस्टरबाजी करण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून तुफान खर्च करण्यात येत आहे.

२० हजार घरकुल लाभार्थी सांगण्यात येत असले तरी ४० हजार लोकं उपस्थित राहू शकतील असे आयोजन करण्यात आले आहे. नेमक्या किती लोकांसाठी काय आयोजन करण्यात आले आहे?

नाशिक विभाग : २०,००० लाभार्थी आणि त्यांच्यासाठी ४०० बसेस
नगर विभाग : १२,००० लाभार्थी आणि त्यांच्यासाठी २४० बसेस
औरंगाबाद : ४,००० लाभार्थी आणि त्यांच्यासाठी ८० बसेस
बीड : २,००० लाभार्थी आणि त्यांच्यासाठी ४० बसेस
पुणे : २,००० लाभार्थी आणि त्यांच्यासाठी ४० बसेस

त्यानुसार तब्बल ८०० बसेसने ४०,००० लोकं आणण्यात येणार आहेत आणि त्यासाठी सरकारी तिजोरीतून तब्बल २ कोटी रुपये इतकी रक्कम खर्च करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते धनंजन मुंडे यांनी सरकारच्या या उधळपट्टीवर सडकून टीका केली आहे तसेच राज्य दुष्काळाच्या छायेत असताना आणि राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना केवळ मोदींच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमविण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून तब्बल २ कोटी रुपये खर्च केले जात आहेत असा थेट आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.

नेमकं काय ट्विट केलं आहे धनंजय मुंडे यांनी?

rupees two crore expenses for pm modis program at shirdi