मुंबई : उत्तर प्रदेशातील नुकत्याच लागलेल्या पोटनिवडणुकीतून ही भाजपच्या अंताची सुरवात असल्याची जोरदार टीका सामना या मुखपत्रातून मोदी सरकारवर करण्यात आली आहे. इतकेच नाही तर नरेंद्र मोदी इतके लोकप्रिय असताना उत्तर प्रदेशातील किल्ले का ढासळले असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे.

उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीतून जे निकाल हाती आले त्यातून भाजपला धक्का बसला असताना त्याच संधीचा फायदा घेत सर्वच विरोधी पक्ष मोदी सरकारवर सडकून टीका करत आहेत. शिवसेनेचे मुखपत्रातून तीच संधी साधत भाजपवर बोचरी टीका केली आहे.

पुढे सामना मध्ये असं ही लिहिण्यात आलं आहे की, उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीचे जे निकाल हाती आले आहेत त्यानंतर मोदी सरकारमध्ये घबराट पसरली आहे आणि मोदींच्या लोकप्रियतेचा जो प्रचार केला जातो त्यालाच अनुसरून सामना मध्ये प्रतिप्रश्न विचारण्यात आला आहे की, जर मोदी हे प्रचंड लोकप्रिय व्यक्तिमत्व असतील तर उत्तर प्रदेशातील किल्ले का ढासळले ?

मित्र पक्षांना दूर लोटले आणि खोट्याचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटे येतात अशी बोचरी टीका करण्यात आली असून पुढे असं म्हटले आहे की उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या पोटनिवडणुकीने भाजपच्या अहंकाराचा आणि उन्मत्तपणाचा पराभव केला आहे.

आता या सामानातून केलेल्या या टीकेला भाजप कडून कोणती प्रतिक्रिया येते याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Saamna newspaper article against the Modi