मुंबई : #MeToo मोहिमेवर सध्या देशभर वादंग निर्माण झालं असताना अभिनेते शक्ती कपूर यांनी वेगळीच शंका या मोहिमेवर उपस्थित केली आहे. त्यांच्या नुसार या प्रकरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मुली या केवळ ब्लॅकमेल करत असल्याची टीका तसेच शंका शक्ती कपूर यांनी व्यक्त केली आहे. उद्या असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा होतील अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे.
#MeToo मोहिमेमुळे बॉलिवूडपासून सुरू झालेल्या या मोहिमेत क्रीडा, पत्रकार, राजकारणी अशा अनेक क्षेत्रातील दिग्गजांची नावं समोर आली. परंतु दुसऱ्याबाजूला अनेकांनी या मोहिमेवर शंका सुद्धा उपस्थित केली आहे. अनेकांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शविला असला तरी काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या मोहिमेवर आता हिंदी चित्रपट श्रुष्टीत ‘बॅड बॉय’ अशी ओळख असलेले अभिनेते शक्ती कपूर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी या मोहिमेवरच अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या मोहिमेत हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
#MeToo मोहिमेवर शंका उपस्थित करताना त्यांनी म्हटलं आहे की, या प्रकरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मुली केवळ ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे अशा प्रकरणात संबंधित व्यक्तीचं नाव जाहीर न करता न्यायालयात जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याची नाहक होणारी बदनामी रोखावी. कलाकार असो, व्यावसायिक असो किंवा राजकारणी असो, न्यायालयात आरोप सिद्ध झाल्यावरच त्यांची नावं जाहीर करावी,’ असं शक्ती कपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.
कोणावरही असे आरोप केल्यानंतर त्याच्यावर काय परिस्थिती ओढवते हे ते या क्लिपमध्ये सांगत आहेत. ‘अशा प्रकारे बेछूट पणे करण्यात आलेल्या आरोपांमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. त्यांचं पूर्ण करिअर अशा आरोपांमुळे संपुष्टात येत. त्यांचे कुटुंबीयसुद्धा त्यांच्याकडे संशयाने पाहू लागतात. आरोप झालेले जर नोकरदार असतील तर त्यांना नोकरीवरून हाकलण्यात येत. त्यामुळे मोदींनी या प्रकरणात लक्ष घालून कायदा करावा. साजिद खान, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन यांच्यावर सुद्धा आरोप केले जात आहेत. या आरोपांमुळे साजिदला चित्रपटाच्या दिग्दर्शक पदावरून हटवण्यात आलं. उद्या मोदी साहेब तुमच्यावरही आरोप होतील, तेव्हा तुम्ही काय करणार?,’ असा प्रश्न शक्ती कपूर यांनी विचारला आहे.
