मुंबई : औद्योगिक गुंतवणुकीच्या बाबतीत देशात सतत अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची आता अधोगती सुरु असताना शिवसेनेने सामना या मुखपत्रातून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. वास्तविक राज्याचं कॅबिनेट उद्योगमंत्री पद हे शिवसेनेच्या सुभाष देसाई यांच्याकडे असताना शिवसेनेने ही टीका केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नाणार’मधील टीकेनंतर आणि फसलेल्या उद्योगनीतीनंतर ५ वर्ष मंत्रिपद स्वतःकडे ठेऊन सर्व दोष भाजपाच्या माथी मारण्याचे प्रकार सुरु असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

सामना मधील अग्रलेखात म्हटलं आहे की,”गुजरात विकासाचे ‘मॉडेल’ संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून तिकडे सुद्धा गुंतवणूकदारांची संख्या घटली असल्याचे टले आहे. तसेच शेजारच्या कर्नाटकात मागील १० वर्षांपासून बिगर भाजप शासन सत्तेवर आहे तर महाराष्ट्र आणि गुजरातेत भाजपचे ‘मेक इन इंडिया’ राज्य आहे. पण तरी सुद्धा या दोन्ही राज्यांची औद्योगिक आणि आर्थिक घडी विस्कटलेली दिसते अशी टीका करण्यात आली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या विकासाचे अजगरी वेटोळे महागड्या मेट्रोभोवतीच पडले असून केवळ काही ठराविक उद्योगपतींच्या सोयीसाठी ‘अवनी’ नावाच्या वाघिणीस मारले जाते, असा सणसणीत टोला सुद्धा लगावला आहे.

दरम्यान, कर्नाटकने औद्योगिक गुंतवणुकीच्या बाबतीत झेप घेतली याचे दुःख नाही, पण महाराष्ट्र राज्य या बाबतीत का घसरला याचीच टोचणी असल्याची खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे. तुम्ही विकासाच्या गॅसचे फुगे किती सुद्धा उडवले तरी योग्य वेळ येताच ते फुटतात. एकीकडे गुजरातेत ४,५०० कोटी इतका सरकारी निधी वापरून सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभा केला. तसा महाराष्ट्रात ३,५०० कोटी रुपये सरकारी खर्चाने छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहणार आहे, केवळ त्याला मुहूर्त सापडत नाही अशी टीका केली आहे.

shiv sena chief udhav thackeray slams bjp on maharashtra industrial development growth