मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उफाळलेला केरळमधील शबरीमला मंदिराचा वाद आणि अयोध्येतील राम मंदिराबाबत नरेंद्र मोदींनी मांडलेली भूमिका या मुद्द्याला अनुसरून शिवसेनेने मोदी सरकार आणि आरएसएस’वर सामनामधून बोचरी टीका केली आहे. ‘हिंदुत्वाच्या नावावर देशात सध्या जो खेळखंडोबा सुरू आहे तसा तर काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा झाला नव्हता असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी सामनामधून केला आहे.
आज मोदी सत्तेवर आहेत आणि राम मंदिर उभारता येत नसल्याचे खापर ते काँग्रेसवर फोडत असून यावरुन मोदींना राज्य करणे जमले नाही आणि आरएसएस’ला सुद्धा घोड्यास लगाम घालणे जमले नाही हे स्पष्ट होते’, अशी खरमरीत टीका शिवसेनेने केली आहे. दरम्यान, अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी केंद्रात अध्यादेश काढला जाणार नाही. कायद्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राममंदिर उभारणीबाबत अध्यादेश काढण्याचा विचार होईल, असे मोदींनी मुलाखतीत स्पष्ट केले होते.
एकीकडे केरळात मंदिर आणि हिंदुत्व रक्षणासाठी आरएसएस रस्त्यावर उतरत आहे, पण अयोध्येतील राममंदिरप्रश्नी ते थंड आहेत. मोदी यांच्या कोर्टाच्या बतावणीवर ‘लोकभावना’ फेम आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा बोलत नाहीत व मोहन भागवत पुढे जात नाहीत’, असा चिमटा सुद्धा शिवसेनेने काढला आहे. काही दिवसांपूर्वी आरएसएस’ने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर खरमरीत भाषेत टीका केली होती आणि त्याला सुद्धा शिवसेनेने आजच्या सामानामधील अग्रलेखातून प्रतिउत्तर दिलं आहे असंच म्हणावं लागेल.
