मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोतोश्रीवर आयोजित केलेल्या आढावा बैठकीला अनेक खासदारांनी हजेरी लावली खरी, परंतु त्याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. त्यामुळे पक्ष प्रत्येक खासदाराच्या मतदार संघाचा आढावा घेतल्या शिवाय स्वबळ की एकत्रित निवडणुका याबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच आढावा बैठकीला येणारे खासदार कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत.
मातोश्रीवरील या बैठकीला खासदार संजय राऊत, आमदार एकनाथ शिंदे, आमदार दिवाकर रावते, आमदार रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, भावना गवळी, आनंदराव अडसूळ आणि कृपाल तमाने हे ४ खासदार सुद्धा उपस्थित होते. आघाडीचा उमेदवार उभा राहिल्यास काय परिस्थिती असेल? अशा सर्व बाजू पक्षप्रमुख पडताळून पाहत आहेत.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये शिवसेना स्वबळावर वाढल्यास पक्षाला मोठा फटका पडणार असल्याचं त्या सर्व्हेमध्ये मत नोंदवण्यात आलं आहे. शिवसेना स्वबळावर लढल्यास राज्यातील एनडीएच्या जागा तर घटातीलच, परंतु शिवसेनेच्या वाट्याला लोकसभेच्या केवळ २ जागा येतील असा धक्कादायक निष्कर्ष त्यात नोंदवण्यात आला आहे आणि त्यामुळे शिवसेना स्वबळाबाबत द्विधा मनस्थितीत असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
