नवी दिल्ली : सत्तेत राहून भाजपला विरोध करत राहायचा आणि योग्य वेळ येताच स्वतःची ‘बार्गेनिंग पावर’ वापरून महत्वाची खाती पदरात पाडून घ्यायची रणनीती सध्या सत्ताधारी आपसातच करताना दिसत आहेत. ज्या चंद्राबाबूंच्या तेलुगू स्वाभिमानाने केंद्रातील मंत्रिपदांना मागचा पुढचा विचार न करता लाथ मारली, त्याच रिक्त झालेल्या मंत्रिपदावर दिखाऊ स्वाभिमान दाखविणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचा डोळा असल्याचे भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांकडून समजतं.
टीडीपीच्या दोन केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने नागरी हवाई वाहतूक मंत्रालय ‘कॅबिनेट’ आणि विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्रीपद रिक्त आहे. केंद्रातील ही दोन्ही रिक्त झालेली खाती शिवसेनेला देण्याचा प्रस्ताव शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे कालच्या भेटी दरम्यान ठेवल्याचे भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटींवर प्रसार माध्यमांना सांगितलं आहे. इतकाच नाही तर राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात सुद्धा एक कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन राज्यमंत्रीपद देण्याची ग्वाही सुद्धा अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचे गोपनीय वृत्त आहे.
त्यामुळे एकूणच शिवसेनेने स्वाभिमानाच्या आणि स्वबळाची बाता प्रसार माध्यमांसमोर केल्या खऱ्या, परंतु प्रत्यक्ष पडद्याआड वेगळ्याच हालचाली सुरु असल्याचे समजते. मागील चार वर्षातील रुसवे फुगवे मोठ्या मनाने बाजूला ठेवत चालून आलेली नामी संधी शिवसेनेने हेरल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेनेचे अनेक नेते आणि प्रवक्ते बोलत एक आहेत. परंतु दोन्ही पक्षात पडद्याआड वेगळ्याच हालचाली होत असल्याचे भाजपमधील वरिष्ठ नेते बोलत आहेत.
