मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत संघटनात्मक मोठे फेरबदल होण्यास सुरुवात झाली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाईंची कोकण संपर्कप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत असलेली संपूर्ण कोकणाची जवाबदारी काढून केवळ रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग’ची जवाबदारी ठेऊन एकनाथ शिंदेंकडे ठाणे, कल्याण, भिवंडी तसेच पालघरची जवाबदारी देण्यात आली आहे.
या फेरबदलांमध्ये विभागप्रमुख तसेच संपर्क नेते पदाचा सर्वाधिक समावेश आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देऊन काही जणांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळेच कांदिवली पूर्व, मालाड पश्चिम आणि चारकोपचे विभाग प्रमुख कॅप्टन अभिजित अडसूळ याची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामागे सुभाष देसाई, रामदास कदम आणि सुनील प्रभू यांनी केलेल्या तक्रारी हे कारण समोर येत आहे.
यापुढे सुद्धा पक्ष संघटनेत मोठे फेरबदल पाहावयास मिळू शकतात. त्यामुळे स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेला भाजपच्या विजय घोडदौडीमुळे खडबडून जाग आल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे पुढे पक्षात स्थानिक पातळीवर काही समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून शिवसेनेने काळजी घेण्यास सुरुवात केली आहे असं राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे.
