मुंबई : लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होऊन तब्बल ७२ तास उलटल्यानंतरही राज्यातील एसटी बसेसवरील सरकारी जाहिरातींची पोस्टर्स कायम असल्याचे स्पष्ट पणे निदर्शनास येते आहे. सदर विषयाला अनुसरून मुंबई शहराच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाला विचारणा करताच एसटी महामंडळाला याबाबतच्या सूचना केल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, एसटीच्या मुंबई सेंट्रलसह इतर आगारांत आचारसंहितेच्या घोषणेनंतरही राजकीय पोस्टर्स कायम असल्याची बातमी प्रसार माध्यमांनी काल प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने आगारांमधील पोस्टर्स काढले. मात्र एसटी बसेसवरील पोस्टर्स आणि स्टीकर्स बुधवारीही कायम असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी शहराच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाला विचारणा केली असता, एसटी महामंडळाला सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
