अहमदनगर : नगरमध्ये उध्दव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक झाली असून त्यात काही शिवसैनिक सुद्धा किरकोळ जखमी झाल्याचे कळते. परंतु शिवसेनेकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले असून अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे कळवले आहे.
उध्दव ठाकरे अहमदनगरमध्ये शिवसेना आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिम्मित आले होते. तेथे त्यांचा एक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्या शेतकरी मेळाव्याला शिवसेना प्रमुख संबोधित करणार होते.
पुढे असेही समोर येत आहे की, सेना स्थानिक आमदार विजय औटी यांचे कट्टर विरोधक आणि तालुकाप्रमुख निलेश लंके गटाने जोरदार घोषणाबाजी करत उध्दव ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचे आरोप स्थानिकांकडून होत आहेत.
परंतु शिवसेनेने मात्र या वृत्ताचे खंडन केले असून ही वृत्तवाहिन्यांवर येणारी माहिती चुकीची असून अशाप्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुढे असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे की, शेतकरी मेळावा संपल्यावर उध्दव ठाकरे निघाले असता मागून येणाऱ्या एका गाडीने माजी आमदार अनिलभैया राठोड यांच्या अंगावर चुकून गाडी घातली त्यामुळे झालेल्या तणावातून कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्या गाडीची काच तुटली.
