मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्या अनुषंगाने सर्वच पक्ष झपाटून कामाला लागले आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणजे सत्तेत राहून तब्बल साडेचार वर्ष मोदींवर आणि भाजपवर वारंवार टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वबळाच्या नाऱ्यावरून पलटले आहेत. अगदी विरोधकांच्या सुरात सुर मिळवून राफेल लढाऊ विमानांच्या कारणावरून देखील मोदींवर टीकास्त्र सोडण्यात आलं होतं.
शेतकरी आत्महत्या, वाढलेली महागाई तसेच जाहिरातीतील विकास या सगळ्याच टीका सध्या युतीमुळे मागे पडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला हिंदुत्व आणि राम मंदिराच्या निर्माणावरून इशारा देत ‘पहले मंदिर फिर सरकार’ अशी घोषणा केली होती. परंतु, भाजपकडून हव्या त्या राजकीय मागण्या पूर्ण होताच त्या घोषणेला तीरांजली देत ‘पहले सरकार फिर मंदिर’ अशी अवस्था झाली आहे.
सध्या उद्धव ठाकरे यांच्या सत्ताकाळातील घोषणा आणि टीका यांचा मागोवा घेतल्यास, त्यांची राजकीय विश्वासार्हताच संपुष्टात येण्याची शक्यता असून, मतदाराने त्यांच्यावर विश्वास का ठेवावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राफेल कारणावरून मोदी पुरते फसले असताना, राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिळवून उद्धव ठाकरे यांनी देखील ‘चौकीदार चोर हैं’ असा आरोप केला खरा, परंतु सध्या त्यांची राजकीय अपरिहार्यता पाहता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या गळ्यात गळा घालून ‘चौकीदार चोर हैं’ ऐवजी ‘चौकीदार थोर हैं’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यास नवल वाटणार नाही.
