मुंबई: मुंबईमधील बेस्ट संप चर्चेच्या मार्गानं तडीस लावण्यात येईल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सुरुवातीपासूनच दोन्ही बाजूने चर्चा सुरू आहे. तसेच या संपात सहभागी झालेल्या एकाही कामगाराची नोकरी जाणार नाही, असं आश्वासन सुद्धा उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांसमोर दिलं.
तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सकारात्मक विचार सुरू असल्याची माहिती सुद्धा त्यांनी यावेळी माध्यमांना दिली. शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनानंतर त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेनेची बेस्ट संपाबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
दरम्यान बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प परस्परांमध्ये विलीन करण्यात यावा, अशी संपकरी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. याबाबतचा ठराव सुद्धा मंजूर करण्यात आला आहे. सध्या बेस्ट उपक्रम प्रचंड तोट्यात सुरू आहे. त्यामुळे सर्वप्रथम हा प्रचंड तोटा कमी करण्याचा विचार सुरू आहे. त्यात बेस्ट ही सेवा असल्यानं फायद्यात आणण्याचा तसा अजिबात आग्रह नाही. परंतु, ना नफा ना तोटा तत्त्वावर तरी ही सेवा सुरू ठेवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रशासनाला काही सुधारणा सुद्धा सुचवल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
