मुंबई : आम्ही यापुढे शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करू परंतु त्याआधी शिवसेनेशिवाय निवडणूक स्वबळावर जिंकणं शक्य आहे हे पालघर लोकसभा निवडणुकीत सिद्ध झालं आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं असून पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईत आज भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी पालघर पोटनिवडणुकीचा हवाला देत शिवसेनेशिवाय निवडणूक स्वबळावर जिंकणं शक्य आहे असा आत्मविश्वास व्यक्त केला.
भाजप नैतृत्व शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करेल परंतु तसे न झाल्यास शिवसेना भाजपसोबत असो, वा नसो पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागा, अशी थेट सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सुद्धा समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे असं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे भाजप सुद्धा आगामी निवडणुकीसाठी कामाला लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
