पुणे: राष्ट्रवादीतून भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले तसेच काही अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी केला आहे. पुण्यात राष्ट्रवादीची कोअर कमिटीची बैठक सुरु असून तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी हे विधान केले. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, अजित पवार, धगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे आदी उपस्थित आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Party) येऊ इच्छिणार्‍या आमदारांचे नाव मी उघड करणार नाही. त्यामुळे ते अडचणीत येतील. मात्र आमच्या कार्यकर्त्यांना आणि आमदारांना विचारल्याशिवाय या आमदारांना पक्षात प्रवेश देण्यात येणार नाही. भारतीय जनता पक्षात गेलेले राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि अपक्ष आमदारांनाही राष्ट्रवादीत यायचे आहे, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, असे जयंत पाटील यांनी सांगितले. सरकार स्थापनेबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत.

तालुक्यातील नेत्यांना विश्वास घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये गेलेल्या आमदारांना परत घ्यायचं की नाही, याबाबतचा निर्णय घेऊ. आम्ही मेगाभारती करणार नाही तर मेरिट भरती करू. जनतेच्या मनातील सरकार आम्ही देणार आहोत. स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत,’ अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, ज्या भारतीय जनता पक्षाविरोधात लढलो त्या पक्षासोबत जाण्याला मर्यादा आहेत, असं सूचक विधानही जयंत पाटील यांनी केलं. राष्ट्रवादीच्या बैठकीला आले असताना पाटील यांनी भाजपासोबत जाण्याची शक्यता पूर्णतः फेटाळली नाही. शिवसेनेसोबत जाण्यासंदर्भात ‘दगडापेक्षा वीट मऊ’ अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्यात सरकार देण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. शरद पवारच याबाबत निर्णय घेतील, असंही पाटील म्हणालेत.

आम्हाला ट्विटरवर फॉलो करा

भाजपचे व अपक्ष आमदार आमच्या संपर्कात, लवकरच निर्णय घेऊ पण मेरीटवर: जयंत पाटील