हॉकी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने सलग दुसरा विजय संपादन केला आहे. पहिल्या सामन्यात कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तानला ४-० अशी मात दिल्यानंतर आता थेट रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटीनाला २-१ असा धक्का दिला आहे.
रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटीना संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळी करत भारतीय हॉकी टिमवरील दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या बचावफळीने अर्जेंटिनाच्या टीमच्या आक्रमक खेळीला चांगलंच प्रतिउत्तर दिल.
अखेर सामन्याच्या १७व्या मिनिटाला भारताच्या हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नवर अचूक गोल करत भारतीय टीमला १-० अशी आघाडी मिळवून दिल्याने भारताच्या विजयाच्या अशा पल्लवित झाल्या. परंतु काही वेळात अर्जेंटिनाची टीम पुन्हा आक्रमक खेळीत उतरली आणि भारतावर दबाव वाढविण्याचे तंत्र वापरू लागली.
परंतु भारतीय टीमचा गोलपोस्टचा बचाव उत्तम असल्याने अर्जेंटिनाचे आक्रमण फिके झाले. पुन्हा मनदीपने गोलपोस्टमध्ये बॉल अचूक डागत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु अर्जेंटिनाच्या गोंझोले पेयाटने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन अर्जेंटिनाच्या खात्यात एक गोल टाकून भारताविरुद्ध २-१ अशी गोलसंख्या केली. भारताच्या बचावफळीने उत्तम खेळ केल्याने भारताने अर्जेंटिनावर २-१ अशी मात केली. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियन टीम बरोबर होणार आहे.
