मुंबई : वयाच्या सातव्या वर्षीच देशातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून केवळ देशातच नव्हे तर परदेशी स्पर्धकांवर सुद्धा साईश्वरने छाप पाडली आहे. अल्पावधीतच साईश्वर गुंटूक’ला लोकं ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ या नावाने ओळखू लागले. मूळचा सोलापूरचा असलेला साईश्वर केशव गुंटूकचे सातव्या वर्षातील विक्रम बघितल्यावर थक्क व्हाल असच त्याच कर्तृत्व आहे. एकदा सहज म्हणून फिरायला कोल्हापूरला आला आणि धावण्याची हौस म्हणून पहिल्यांदा त्याने कोल्हापूर येथील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा त्याने सहज खिशात टाकली. परंतु तिथेच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्यानंतर त्याने मध्य प्रदेशातील हिल मॅरेथॉन ही अवघड स्पर्धा जिंकली.

त्यानंतर साईश्वरने पुण्यातील एच २० मॅरेथॉन ही १० किलोमीटरची स्पर्धा केवळ ५८.०६ मिनिटात पार केली आणि सर्व दिग्गज स्पर्धकांना विचार करायला भाग पाडलं. त्यानंतर साईश्वरने हैद्राबाद मधील लव्ह स्पर्धेत अनेक दिग्गजांना धूळ चारली आणि मेडलवर स्वतःच नाव कोरल. तर पंजाब मधील नॅशनल सोलन हाफ डोंगरी मॅरेथॉन ही ११ किलोमीटरची स्पर्धा त्याने अवघ्या २.०३ तासात जिंकून जागतिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना डोक्याला हात लावायची वेळ आणली. त्याचवेळी पंजाबच्या क्रीडामंत्र्यांच्या हस्ते साईश्वरला ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आलं.

चिमुकल्या साईश्वरची सातव्या वर्षातील कीर्ती अशी झाली की लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेत जिथे संपूर्ण देशातून म्हणजे तामिळनाडू, पंजाब, आसाम, हरियाणा, मुंबई, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यातून खेळाडू भाग घेत असताना साईश्वरला त्या स्पर्धेचा ‘ब्रँड अम्बॅसिडर’ करण्यात आलं. तिथे छोट्या साईश्वरला मुख्य अतिथी हा मान मिळाला. आगामी मुंबई मान्सून आणि जम्मू मॅरेथॉन स्पर्धेत सुद्धा साईश्वर ‘ब्रँड अम्बॅसिडर’ असणार आहे. बर साईश्वर इथेच थांबला नाही कारण मुंबईमध्ये मे महिन्यात मुंबईमध्ये पार पडलेल्या ‘रन फॉर ट्राय’ मध्ये भाग घेतला आणि त्याच्या धावण्याचा वेग पाहून ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इंडोनेशिया आणि आयर्लंड मधील स्पर्धक सुद्धा अवाक झाले. त्यामुळे हा छोटा जवान पुढे काय पराक्रम करू शकतो त्याचा अंदाज येऊ शकतो.

परंतु जे इतर राज्यांना आणि परदेशातील स्पर्धकांना कळत आहे ते आपल्या महाराष्ट्रातील राजकारण्यांना समजत नसल्याचे चित्र आहे. अगदी सोलापुरातील स्थानिक राजकारणी सुद्धा साईश्वरला केवळ शुभेच्छा देऊन वेळ मारून घेत आहेत असच काहीस चित्र आहे. राज्य सरकारच्या दरबारी मात्र साईश्वरच्या कुटूंबाला निराशाच पदरी पडत आहे. काही दिवसांपासून त्याच्या वडिलांनी अनेक राजकारण्यांची भेट घेतली, परंतु शेवटच्या तारखेपर्यंत निराशाच पदरी पडली. मुंबई मॅरेथॉनच्या आयोजकांनी त्याच्या वयाचा बहाणा पुढे केला.

वास्तविक, वाईल्ड-कार्ड या शब्दाचा अर्थ ना त्या आयोजकांना समजला ना त्या राजकारण्यांना, असंच त्याच्या वडिलांना ध्यानात आलं. देशभरात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत हाच नियम होता. परंतु, त्या मुलाचा इतिहास आणि पराक्रम पाहून, त्याला बाहेरच्या राज्यातील आयोजकांनी वाईल्डकार्ड मार्फत स्वतः बोलावून निमंत्रण दिलं आणि स्पर्धेत प्रवेश सुद्धा दिला. बडोद्याच्या गायकवाड राजे कुटुंबीयांनी तर त्याच्या कुटुंबियांना बोलावून घेतले आणि तिथे त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या आहेत. गुजरातमध्ये त्याला एका स्पॉन्सरची सुद्धा लवकर सोया केली जाणार आहे. त्यामुळे जे इतर राज्यांना कळतं ते आपल्या दूरदृष्टी नसलेल्या राजकारण्यांना कधीच कळणार नाही, असंच म्हणावं लागेल.

परंतु सर्वात खेदाची गोष्ट हीच म्हणावी लागेल आणि ती म्हणजे साईश्वरची मुंबईच्या मॅरेथॉनमध्ये पराक्रम करण्याची फार इच्छा होती. कारण ४-५ केनिया आणि नायजेरियन स्पर्धक मुंबई मॅरेथॉनमध्ये येतात आणि संपूर्ण मुंबईच्या नाकावर टीच्चू देऊन सर्व पदकं घेऊन जातात. त्यातील ९५ टक्के मुंबईकर हे केवळ फोटो आणि टाईमपास’साठीच मुंबई मॅरेथॉनमध्ये धावतात. हातावर मोजावे इतकेच धावपटू हे जिंकण्याच्या इर्षेने आलेले असतात आणि साईश्वर सुद्धा त्याच जिद्दीने उतरणार होता. पण इथल्या राजकारण्यांचा सुस्तपणा त्या जिद्दीला काही साथ देण्यास तयार नाही, असंच म्हणावं लागेल.

Mumbai marethon saishwar do not got justice like other state