पोटशेफस्ट्रूम: १९ वर्षाखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवा संघाने पाकिस्तानच्या युवा संघाचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पाकिस्तानने दिलेले १७३ धावांचे आव्हान टीम इंडियाने १० गडी राखून सहजपणे पार केले. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने या महत्त्वाच्या सामन्यात शतकी खेळी साकारली. तर, दिव्यांश सक्सेनाने नाबाद ५९ धावांची खेळी साकारली.

भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव १७२ धावांमध्ये आटोपला होता. या आव्हानाचा भारताना सुरेखपणे पाठलाग केला. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी दमदार फलंदाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानचा सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहैल नाझीर यांची अर्धशतकी खेळी वगळता पाकच्या अन्य फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे पाकला जेमतेम १७२ धावा करता आल्या.

पाकिस्तानकडून फॉर्मात असलेला मोहम्मद हुरायरा अवघ्या ४ धावा काढून सुशांत मिश्राच्या गोलंदाजीवर माघारी परतला आणि पाकिस्तानला पहिला धक्का बसला. यानंतर रवी बिश्नोईने फआद मुनीरला शून्यावर बाद करत पाकला दुसरा धक्का दिला. यानंतर सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहिल नाझीर यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण २३ सामने झाले आहेत. यातील १४ भारताने तर ८ पाकिस्तानने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला होता. सध्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा यशस्वी जयस्वाल फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत पाक ९ वेळा आमने सामने आले आहेत. यात ४ वेळा पाकिस्तान तर ५ वेळा भारताने विजय मिळवला आहे. मागील ३ सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवलं आहे.

 

Web Title:  Under 19 Cricket World Cup 2020 India beat Pakistan by 10 wickets and enter in Final.

Under-19 World Cup IND Vs PAK: पाकला घरचा रस्ता, टीम इंडिया फायनलमध्ये