नुकताच झाशीची राणी लक्ष्मीबाईवर एक चित्रपट आलाय. ज्याची कथा बाहुबली फेम के.वी विजयेंद्र ने लिहिली आहे. ह्या चित्रपटाचे नाव आहे मणिकर्णिका. तुम्हाला प्रश्न पडला असेल की चित्रपट राणी लक्ष्मीबाईंवर आहे आणि चित्रपटाचे नाव मणिकर्णिका का ? ह्याची दोन कारणं आहेत, एक म्हणजे लक्ष्मीबाईंचे माहेरचे नाव मणिकर्णिका होते. मोरोपंत तांबे आणि भागीरथी बाई ह्यांची ती एकुलती एक मुलगी. मोरोपंत तिला लाडाने मनू म्हणायचे. तिचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ साली वाराणशी येथे मराठी कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. दुसरं कारण म्हणजे इथेच मणिकर्णिका घाट आहे. लक्षमीबाईचे बालपण येथेच गेले. इथेंच ती घोडेस्वारी आणि तलवार चालवायला शिकली.
मणिकर्णिका घाट हे नाव का पडलं ह्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की भगवान विष्णूनी ह्या जागेवर भगवान शंकर प्रसन्न व्हावेत म्हणून तपश्चर्या केली. त्यावेळेस सुदर्शन चक्राने त्यांनी कुंड निर्माण केले. तपश्चर्या करताना आलेल्या घामाने हे कुंड भरले. जेव्हा भगवान शंकर प्रसन्न होऊन तिथे प्रकट झाले त्यावेळेस भगवान विष्णूंच्या कानातली मणिकर्णिका म्हणजेच कुंडल ह्या कुंडात पडले. तेव्हापासून ह्या कुंडाला नाव पडले मणिकर्णिका.
आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान शंकर आपल्या भक्तांच्या मार्गात येणारी विघ्न दूर करण्याच्या कामात एवढे गढून गेले की पार्वतीसाठी त्यांना वेळ मिळत नव्हता तेव्हा त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पार्वतीने युक्ती केली. तिने आपल्या कानातल आभूषण इथे लपवलं आणि शंकरांला शोधून देण्याची विनंती केली. शंकराने खूप प्रयत्न केला शोधण्याचा पण त्याला ते शक्य झाले नाही. शोधल्याशिवाय त्याला परत जाता येईना आणि शंकराला आपल्याजवळ ठेवण्याची पार्वतीची युक्ती सफल झाली.
आणखी एका दन्तकथेनुसार ह्या घाटाचा मालक हा चांडाळ होता ज्याने राजा हरिश्चंद्राला विकत घेतले होते आणि त्याला ह्या घाटावर अंत्येष्टीसाठी येणाऱ्या लोकांकडून कर गोळा करण्याचे काम दिले होते. ह्या घाटाबद्दल असे प्राचीन संदर्भ आढळतात. ह्याच घाटावर खेळताना आणि शस्त्र चालवायला शिकताना लक्ष्मीबाइच्या मनात स्वाभिमानाच स्फुल्लिंग पेरलं गेलं असावं. ह्याच घाटावरचा पाणी पिऊन तिच्यातली क्षात्रतेजाला धार चढ़ली त्यामुळेच स्वातंत्र्य संग्रामात तिने अभूतपूर्व पराक्रम गाजवला. “मेरी झांसी नही दूंगी” असं तिने ब्रिटिशाना ठणकावून सांगितलं.
शेवटच्या श्वासापर्यंत राणीने ब्रिटिशांशी लढा दिला. तिचा पराक्रम पाहून ब्रिटीशानीही तोंडात बोट घातली. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मीबाईची महिला सेना. तिच्या महिला साथीदारांनीही तेवढाच पराक्रम गाजवला. ज्यात प्रामुख्याने झलकारीबाईचे नाव घेतलं जातं. ही महिला सेना तयार करण्याचं कर्तृत्वही लक्ष्मीबाईचंच. म्ह्णूनच १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात लक्ष्मीबाईचं म्हणजेच मणिकर्णिकेचं नाव आदराने घेतले जात आणि ह्यापुढेही घेतलं जाईल.
Story English Title: Story Jhansi ki Rani fighting Warrior History on Maharashtranama.
